बीड
गेवराई विधानसभा मतदार संघातील अतिवृष्टी, पूर प्रतिबंधक कामांची मंजुरी, रेशीम पार्क निर्मितीसह अन्य विषयांचा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या बैठकीत आढावा माजी आ. अमरसिंह पंडित व आमदार विजयसिंह पंडित यांनी घेतला.
सोमवारी सायंकाळी या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी समन्वयक सतिष धुमाळ, तहसिलदार संदिप खोमणे, जिल्हा नियोजन अधिकारी यांचे प्रतिनिधी, नगर पालिका प्रशासनाचे जिल्हा सहआयुक्त संभाजी वाघमारे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
बैठकीत गेवराई विधानसभा मतदार संघात झालेल्या अभूतपुर्व अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे बाधित शेतजमीनी, फळपिके, खरडून वाहून गेलेल्या जमीनी आदींच्या पंचनामे व इतर बाबींच्या अनुषंगाने आढावा घेऊन आपदग्रस्तांना द्यावयाच्या मदतीसंदर्भात चर्चा केली.
गेवराई विधानसभा मतदार संघातील पूर प्रतिबंधक कामांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मंजुरी मिळण्याच्या अनुषंगाने चर्चा केली.
गेवराई शहरात ‘रेशीम पार्क’ निर्मिती बाबत कृती आराखडा तयार करणे संदर्भात चर्चा केली. गेवराई शहरातील संजयनगर येथील सर्व्हे नं.१/१ मधील पोलिस विभागाच्या जागेवरील ४१६ आणि भटक्या विमुक्त जमातीसाठी राखीव असलेल्या जागेवरील २१८ भूखंड धारकांचे अतिक्रमण नियमाकुल करून त्यांना हक्काचा पीटीआर देणे संदर्भात चर्चा केली. जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ मधील प्रस्तावित कामांच्या मंजुरी संदर्भात चर्चा केली.
या सर्व मुद्यांच्या अनुषंगाने अतिशय सकारात्मक चर्चा होऊन लोकाभिमुख निर्णय करण्यात आले. गेवराई विधानसभा मतदार संघात नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वाधिक नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे करताना राजकीय गट-तट, जात-धर्म-पंथ असा कोणताही भेदभाव न करता सरसकट पंचनामे करावेत, आपदग्रस्तांना वेठीस धरून लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यानिमित्ताने केली, त्याची गांभीर्याने दखल जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी घेतली.