मुंबई,16
Heavy rains in the state cause major damage in 30 districts राज्यातील अतिवृष्टीमुळे ३० जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले असून ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे.
उर्वरित क्षेत्रांच्या पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरु आहेत. अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
तसेच शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने या परिस्थितीचा सामना करावा, राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे.”असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यात पावसाचे थैमान चालू असून गेल्या दोन महिन्यात अतिवृष्टी, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल ३० जिल्ह्यांतील १९५ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राज्यात १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर (४२ लाख ८४ हजार ८४६ एकर) क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. यात प्रामुख्याने खरीप शेतपिकांचे नुकसान झाले असून सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग, भाजीपाला, फळ पिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांना मोठा फटका बसला आहे.
सर्वाधिक बाधित जिल्हे:
नांदेड – ७२८,०४९ हेक्टर
वाशीम – २०३,०९८ हेक्टर
यवतमाळ – ३१८,८६० हेक्टर
धाराशिव – १,५७,६१० हेक्टर
अकोला – १७७,४६६ हेक्टर
सोलापूर – ४७,२६६ हेक्टर
बुलढाणा – ८९, ७८२ हेक्टर
बाधित पिके:
सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद या पिकांनाही फटका बसला आहे.
एकूण बाधित जिल्हे:
नांदेड, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड, नागपूर आणि पुणे.